बीड जिल्हा पत्रकारितेची पंढरी – वसंत मुंडे
सध्या दोन योजना राबविल्या जात आहे एक लाडकी आणि दुसरी लढाई ची योजना - काज़ी मखदूम

एस.एम.युसूफ़ | विशेष प्रतिनिधी
बीड (जनमंथन वृत्तसेवा) : महाराष्ट्राचा विचार करता बीड जिल्ह्यात सर्वात जास्त प्रिंटेड आणि डिजिटल वृत्तपत्र आहेत. खरं पाहता बीड जिल्हा ही पत्रकारितेची पंढरी आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे वक्तव्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दैनिक ‘प्रभास केसरी’च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार समारंभामध्ये अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. तत्पूर्वी उर्दू दैनिक ‘तामीर’चे ज्येष्ठ संपादक काज़ी मखदूम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारिता, राजकारण आणि कृषी क्षेत्रावर अभ्यासपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या स्थितीवर बोलताना सांगितले की, सध्या दोन योजना जोरात चालू आहे. यापैकी एक लाडकी योजना तर दुसरी लढाईची योजना. या दोन्ही योजनेत कुणाचे भले तर कुणाचे वाईट होणार आहे. यामुळे आता जनतेनेच जागरूक राहणे आवश्यक आहे. यावेळी व्यासपीठावर दैनिक ‘पार्श्वभूमी’चे उपसंपादक प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी, साप्ताहिक शिव वाणीच्या संपादिका आयेशा शेख, ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तम पवार आणि कालिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे उपस्थित होते.
यावेळी प्रा. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी वृत्तपत्राचा इतिहास सांगत लोकशाहीचा चौथा स्तंभ आजही खंबीर उभा असल्याचे स्पष्ट केले. दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांनी वृत्तपत्र चालवताना येणाऱ्या अडचणी विषद करत अनेक वृत्तपत्र मोठ्या कष्टाने उभे असल्याचे म्हटले. यावेळी विचार मंचावर उपस्थित असलेले कालिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वास कंधारे यांनी वृत्तपत्राचा मागोवा घेत वृत्तपत्र मानवी स्वभावाचा अविभाज्य अंग बनले असल्याचे विषद केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना वसंत मुंडे म्हणाले की, “जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणात आज पत्रकार पाहायला मिळत नाहीत. पत्रकार संघटना चालवत असताना अनेक अडचणींना पत्रकार सामोरे जातो याची जाणीव असल्याचेही” ते यावेळी म्हणाले. वर्धापन दिन साजरा करत असतानाच समाजातील महानुभवांचा पुरस्काराच्या स्वरूपामध्ये सन्मान करून त्यांना पुढील काळात ऊर्जा मिळावी या उद्देशाने दैनिक ‘प्रभास केसरी’ने हाती घेतलेला उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या वर्धापन दिनाची सुरुवात करण्यात आली तर आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार, वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार आणि सेवा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आलेल्या महानुभवांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अफरोज सय्यद तर आभार बीड जिल्हा प्रतिनिधी अण्णासाहेब साबळे यांनी मानले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.