जयभीम दिन व मक्रणपूर परिषद सोहळा थाटात संपन्न

एस.एम.युसूफ़ | विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद (जनमंथन वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या मक्रणपुर येथे दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी जयभीम दिन व मक्रणपूर परिषद सोहळा थाटात संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने आंबेडकरी जनता उपस्थित होती. जयभीम दिन व मक्रणपुर परिषद सोहळ्याचे हे ८५ वे वर्ष होते. सन १९३८ साली ३० डिसेंबर रोजी सर्व प्रथम या जयभीम दिनाची सुरुवात स्वातंत्र्यसेनानी दलित मित्र कालकथित भाऊसाहेब मोरे यांनी केली होती. असे म्हणतात की, या अगोदर आंबेडकरी जनता भीम की जय असे म्हणत असे. परंतु हे थोडेसे अवघडल्यासारखे वाटत असल्याने भाऊसाहेब मोरे यांनी सर्वप्रथम, दि. ३० डिसेंबर १९३८ साली भीम की जय ऐवजी जयभीम हा नारा दिला. तेव्हापासून दि. ३० डिसेंबर हा दिवस मक्रणपुर येथे जयभीम दिन म्हणून साजरे करण्यास भाऊसाहेब मोरे यांनी सुरुवात केली. त्याला आता तब्बल ८५ वर्षे झाली आहेत. एवढ्या मोठ्या कालावधीत आजही हा दिवस आंबेडकरी जनता मोठ्या अभिमानाने मक्रणपुर येथे साजरा करीत आहे. विशेष म्हणजे भाऊसाहेब मोरे यांचे चिरंजीव जे उच्च विद्या विभूषित आणि पोलीस प्रशासनात डी.वाय.एस.पी. पदावर कार्यरत असलेले प्रवीण मोरे हे स्वतः जातीने या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाची धुरा समर्थपणे वाहतात तसेच सुविख्यात कवी शायर तथा युट्युबर अजीम नवाज राही हे शुद्ध मराठीतून व खुमासदार शेरोशायरी पेरत उत्कृष्ट सूत्रसंचालन करतात. ते दरवर्षी सुद्धा सूत्र संचालन करतात. त्यांच्या सूत्रसंचालनामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच गरिमा मिळते. यावेळी त्यांना स्वातंत्र्यसेनानी, दलितमित्र भाऊसाहेब मोरे सामाजिक प्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या जयभीम दिनाची ख्याती आंबेडकरी जनतेत महाराष्ट्रभर सर्व दूर पसरलेली असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने या जयभीम दिनासाठी राज्यभरातून मक्रणपूर येथे आवर्जून उपस्थित राहते. यंदा बीड शहरातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनीही आवर्जून दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी जातीने मक्रणपूर येथे जाऊन या कार्यक्रमात उपस्थिती लावली. दरवर्षी हा जयभीम दिन सोहळा स्वातंत्र्य सेनानी दलितमित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठानकडून आयोजित केला जातो.